नाशिक : गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरात पावसाने उघडीप दिली असून, शहरवासीयांना आता आॅक्टोबर हीटची चाहूल लागू लागली आहे. यंदा पहिल्या दीड महिन्यात पावसाने शहराकडे पाठ फिरवल्याने शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचीदेखील पातळी खालावल्याने पाणीपुरवठ्यावर गंडांतर आले होते. अखेर महापालिकेवर पाणीकपात करण्याची वेळ आली होती. काही दिवस शहरात एकवेळच पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांचे हाल झाले होते; मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात पर्जन्यवृष्टीला प्रारंभ झाला. सुमारे तीन ते चार दिवस शहरात पावसाची संततधार सुरू होती. परिणामी, गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन नाशिककर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. दरम्यान, त्यानंतरही पावसाने विश्रांती न घेता शहरात हजेरी सुरूच ठेवली. आॅगस्ट महिन्यात शहरात पहिला नैसर्गिक पूर आला. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने सप्टेंबर महिन्यातही तीनदा शहराला पुराने तडाखा दिला. गंगापूर धरणातून हजारो क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदाकाठावरील घरे, टपऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. मात्र बुधवारपासून पावसाने उघडीप दिली असून, शहरात कडक ऊन जाणवू लागले आहे. पावसामुळे रस्त्यावरील माती मोकळी झाली असून, पाऊस थांबल्यानंतर आता वाहनांच्या येण्या-जाण्यामुळे ही माती हवेत पसरत आहे. त्यामुळे रस्ते धुलिकामय होत आहे. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात थंडीच्या आधी उन्हाची काहिली वाढते. याला ‘आॅक्टोबर हीट’ असे म्हटले जाते. त्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, दुपारी वातावरणातील उकाड्यातील वाढ जाणवू लागली आहे. (प्रतिनिधी)