नांदगाव : आॅनलाइन सातबाराचा उतारा मिळण्याचा कालावधी १५ ते २१ दिवस असल्याने जुने कर्ज फेडून नवीन कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अडचण झाली आहे.अनेक शासकीय व खासगी कार्यप्रणाली आॅनलाइन झाल्याने होणाऱ्या परिणामांची भलीबुरी चर्चा ऐकू येत असते. तलाठी कार्यालये हायटेक झाल्याने सातबारा उतारे असोत, की इतर काहीही. आता वाट बघावी लागणार नाही असे वाटत असतानाच, या समजाला छेद देणारी बाब शेतीविषयक कर्जाच्या नूतनीकरणात घडत असल्याने शेतकरीवर्गात नाराजी आहे. शेतकऱ्यांना खरीप कर्ज एप्रिलपासून मिळत असते. पण नवीन कर्ज मिळण्यासाठी मागील वर्षी (एप्रिल ते मार्च) घेतलेले कर्ज मार्चअखेर फेडावे लागते. तरच एप्रिलमध्ये नवीन कर्ज मिळत असते. आॅनलाइन पद्धत नव्हती तेव्हा, (मागच्या वर्षापर्यंत) शेतकरी जुने कर्ज फेडण्यासाठी उधार उसनवारीने, प्रसंगी व्याजाने खासगी सावकारांकडून पैसे घेऊन मार्च महिन्याच्या शेवटी खरीप कर्जाची रक्कम बँकेत भरून एप्रिलच्या सुरुवातीस नवीन कर्जासाठी अर्ज दाखल करत. याला ‘जुने नवे करणे’ असे म्हणतात. (वार्ताहर)
आॅनलाइन सातबाऱ्याने खोळंबा
By admin | Updated: April 6, 2016 00:20 IST