शिवसेना-भारतीय जनता पार्टी युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील सर्वांत मोठा अडसर राहणार आहे, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. त्यामुळे युती आणि आघाडी मनसेचा कसा सामना करतात, यावरच दोन्ही पक्षांचा सर्वस्वी विजय अवलंबून आहे.तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत पंचवटी अर्थात पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपा विरुद्ध कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा सामना होण्याची शक्यता असतानाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील इच्छुकही अंगाखांद्याला तेल लावून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत असल्याने विधानसभा निवडणुकीत पंचवटीत पुन्हा एकदा घमासान लढत होईल, यात शंका नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी असूनही पूर्व विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. अर्थातच त्यावेळी पहिलीच निवडणूक असूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथून अनुभवी उमेदवार अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या रूपाने खाते उघडले होते. मनसेची लाट आणि अनुभवाच्या जोरावरच मनसेला ही किमया साधता आली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराला येथून आघाडी मिळाल्याने साहजिकच भाजपाला हायसे वाटलेच; परंतु शिवसेनेतील इच्छुकांनाही पंचवटीतून नशीब अजमावण्याचे धुमारे फुटू लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत युती आणि आघाडी झालीच, तर सामना तिरंगी होण्याची शक्यता आहे. कारण मनसेचा आमदार असल्याने येथून मनसेला पुन्हा आमदारकीचे वेध लागलेले आहेत. तशातच नव्याने निर्माण झालेल्या आम आदमी पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या उमेदवारांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते. तूर्तास भाजपा आणि कॉँग्रेसकडूनच उमेदवारासाठी इच्छुकांची भाऊगर्दी असली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ढिकले कुटुंबीयांच्या घरातच उमेदवारी जाण्याची चिन्हे असली तरी ऐनवेळी आयाराम- गयाराम यांच्यामुळे उमेदवारीची गणिते फिसकटू शकतात. मागील निवडणुकीत विजयाने थोडक्यात दिलेली हुलकावणी भाजपाला सतत पाच वर्षे बोचत राहिल्याने यंदा बाजी मारायचीच, असा चंग भाजपाने बांधला आहे, तर काहीही झाले तरी यंदा आघाडीची एक मोट बांधून विजय मिळवायचाच, असा निर्धार कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटातील उमेदवारांनी केला आहे. अर्थात युती आणि आघाडीतील सर्वांत मोठा अडसर राहणार आहे, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. त्यामुळे युती आणि आघाडी मनसेचा कसा सामना करतात, यावरच दोन्ही पक्षांचा सर्वस्वी विजय अवलंबून आहे.भाजपाला आमदारकीचे डोहाळेमागील निवडणुकीत अगदी थोडक्यावरून हुकलेली आमदारकीची संधी यंदा मात्र मिळवायचीच या इराद्याने भाजपा पूर्व विधानसभा मतदारसंघातून तयारीला लागली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते आणि लोकसभेत यंदा शिवसेनेला चांगली आघाडी पाहता भाजपातील इच्छुकांना निवडणुकीच्या आधीपासूनच आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. मागील वेळी आमदार होता होता राहिलेले माजी महापौर यंदा भाजपाकडून उमेदवारीसाठी स्पर्धेत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र, तरीही ऐनवेळी आघाडीतून एखादा तगडा उमेदवार गळाला लागलाच तर सानपांची गोची होऊ शकते. भाजपाकडून माजी नगरसेवक राहिलेले अरुण पवार यांच्यासह सुनील आडके, माजी शिक्षण मंडळ सभापती संभाजी मोरूसकर, नगरसेविका देवायानी फरांदे, सुनील केदार अशी भलीमोठी इच्छुकांची यादी असल्याने भाजपाला उमेदवारी देताना डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेलाही फुटला उमाळातसे पाहता पूर्व मतदारसंघावर युतीच्या वतीने भाजपाचा दावा आहे. भाजपातील इच्छुकांना निवडणुकीच्या आधीपासूनच आमदारकीचे डोहाळे लागले असले तरी ऐनवेळी मतदारसंघाच्या अदलाबदलीत शिवसेनेला जर हा मतदारसंघ सुटलाच, तर इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवार कोण, ही समस्या राहणार नाही. शिवसेनेकडून माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर पूर्वतून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र नसले तर कोण, असा विचार झाला, तर भगवान भोगे यांनी सेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असल्याने त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. त्याचप्रमाणे शैलेश ढगे, मल्हारी मते आणि निवृत्ती मते यांचीही नावे चर्चेत आहे.कॉँग्रेसमध्ये भाऊगर्दीगेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात कॉँग्रेसच्या ताब्यात हा मतदारसंघ असल्यामुळे पूर्व मतदारसंघात कॉँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांत स्पर्धा वाढली आहे. मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले विद्यमान जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या नावाची पूर्वमधून चर्चा असली तरी माजी स्थायी समिती सभापती उद्धव बाबा निमसे यांनीही लोकसभेच्या निवडणुकीतच वणीला एकवीस ‘बोेकडबळी’ देऊन जोरदार चाचपणी केल्याने त्यांचे नाव चर्चेत आहे. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव याही मागील वेळी मध्य विधानसभा मतदारसंघ निवडण्याचा चुकलेला निर्णय दुरूस्त करण्यासाठी यंदा पूर्वमधूनच नशीब अजमावण्यास इच्छुक आहेत. कॉँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.५माकपाची आबाळ, रिपाइंचीही तिच स्थितीबहुतांश झोपडपट्टी भाग असलेल्या फुलेनगर, दत्तनगर, वाल्मीकनगर यांसह मतदारसंघ मध्यमवर्गीयच असल्याने या मतदारसंघात दलित, मुस्लीम व कामगार वर्गांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे या मतदारसंघात आरपीआयने दावा सांगितला, तर नवल वाटायला नको. आरपीआयच्या वतीने गणेश उन्हवणे इच्छुक असून, बहुजन समाज पक्षाकडून मुकुंद गांगुर्डे यांचे नाव चर्चेत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून पूर्वमधून उमेदवारीसाठी थोडी अडचणच येण्याची चिन्हे आहेत.
पुन्हा एकदा घमासान
By admin | Updated: July 2, 2014 00:15 IST