श्याम बागुल नाशिकतेरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची राज्यातच राळ उठलेली. आरोप-प्रत्यारोपांच्या चोहोबाजूंनी झडलेल्या फैऱ्या, मेळावे, बैठकांना आलेला ऊत, पायाला भिंगरी लावल्यागत राज्यस्तरीय नेत्यांचे दौरे, मिनिटागणिक बदलणारी राजकीय परिस्थिती व टायमिंग साधून खेळल्या जाणाऱ्या राजकीय खेळींच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय ‘हेवीवेट’ नेत्याचे हेलिकॉप्टर भरकटले, नाशिक जिल्ह्णाच्या भूमीत उतरण्याऐवजी त्याने मध्य प्रदेशची सीमा गाठली. झाले, वेळेत जाहीरसभेला नेता उपस्थित न झाल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले गेले, तर्क-वितर्काचे पतंग उडले आणि गेली तेरा वर्षे राजकीय अबोला धरला गेला. या तेरा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले म्हणण्यापेक्षा राजकीय प्रवाहात अनेक उलथापालथ झाली. जे संस्थानिक होते, त्यांचा राजकीय पटलावर अस्त झाला तर जे हेवीवेट म्हणून ओळखले गेले त्यांना काळकोठडीत बंद व्हावे लागले. एक छोटासा गैरसमज, परंतु त्याने दोन राजकीय घराण्यांना एकमेकांपासून खूप लांबवर नेले. काळ बदलला, भोवतालची परिस्थिती जशी बदलली तसेच राजकीय समीकरणांनीही आपल्या सीमा ओलांडल्या व न्यायालयाच्या आवारातच अबोला दूर झाला !सन २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा तो काळ होता. सध्याचा मालेगाव बाह्य व त्याकाळच्या दाभाडी मतदारसंघातून प्रशांत हिरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. समोर शिवसेनेकडून दादा भुसे यांनी तगडे आव्हान उभे केलेले. राज्यात कॉँग्रेस आघाडीची सत्ता असल्याकारणाने साहजिकच नाशिक जिल्ह्याचे पालकत्व तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडेच होते. राज्यात सेना-भाजपाचा झंझावात रोखण्याची ताकद असलेल्या भुजबळांवर नाशिक जिल्ह्णाबरोबरच राज्यातील कानाकोपऱ्यातील प्रचाराची जबाबदारी पक्षाने सोपविली होती. दादा भुसे यांनी १९९९च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून हिरे घराण्याचा वंशपरंपरेने ताब्यात असलेला दाभाडी मतदारसंघावर ताबा मिळविला होता, त्याची परतफेड करण्याची संधी २००४ च्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रशांत हिरेंना नियतीने उपलब्ध करून दिली होती. सारी यंत्रणा कामाला लागली, पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद पाठीशी होताच, मतदारांचा कौलही घेतला गेल्याने पराभवाचा वचपा काढण्याची सारी तयारी झाली होती. बस फक्त एकच सभा छगन भुजबळ यांनी मतदारसंघात घेतली तर सारे राजकीय समीकरणे बदलतील असा अंदाज होता. त्यासाठी मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे दुपारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या प्रचार दौऱ्यावर असलेल्या भुजबळ यांनी तत्काळ सभेला अनुमती दर्शविली. गावोगावी भुजबळ यांच्या जाहीरसभेचे निरोप पोहोचले, झंझावाती तोफ धडाडणार म्हणून कळवाडीचे मैदान खच्चून भरले होते. प्रतीक्षा होती फक्त भुजबळांची, परंतु जाहीरसभेच्या नियोजित वेळेपेक्षाही तीन तास उलटून भुजबळ प्रचारासाठी येऊ शकले नाहीत. आयोजकांना सभा रद्द करावी लागली. अचानक रहीत झालेल्या जाहीर सभेचे राजकीय वर्तुळात उलट -सुलट अर्थ काढले गेले. भुजबळ यांनी मुद्दामच सभा रद्द केल्याचा पद्धतशीर प्रचारही केला गेला, त्यामागची कारणमिमांसा करताना नाशिकच्या गडावर भुजबळ यांना हिरे नकोसे झाल्याचा युक्तिवादही केला गेला. भुजबळ यांच्या सभा रद्दचा परिणाम म्हणा किंवा भुसे यांचा करिष्मा, प्रशांत हिरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. हिरे घराण्यासाठी तो सलग बसलेला दुसरा राजकीय धक्का होता. पराभवामागच्या अनेक कारणांपैकी भुजबळ यांचे कारणही तितकेच महत्त्वाचे मानले गेले व निवडणूक निकालानंतर हिरे-भुजबळ यांच्यात ‘अबोला’ आला तो कायमचा. तेरा वर्षांपूर्वी भुजबळांचे जे समर्थन मिळू शकले नाही, ते आगामी अडीच वर्षांनी मिळवून स्वप्नपूर्ती होण्याची आस बाळगून असेलेल्या अद्वय हिरे यांनी दोन पावले मागे होत न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या छगन भुजबळ यांची सदिच्छा (?) भेट घेऊन दोन घराण्यांतील राजकीय अबोला दूर करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच या भेटीचे गौडबंगाल कायम असले तरी, राजकीय क्षितिजावरील ही नवीन नांदी पुन्हा एकवार चर्चेत आली आहे. च्गेल्या तेरा वर्षांत भुजबळ कायमच सत्तेत राहिल्याने त्यांनी हिरे यांच्या अबोलाची कधी पर्वा केली नाही तसेच हिरे यांनीही भुजबळ यांना कधीच आपला नेता मानले नाही, उलटपक्षी या दोन्ही घराण्यांमध्ये एकमेकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शह-काटशह देण्यातच धन्यता मानली गेली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी निर्मिलेला गिरणा साखर कारखाना भुजबळ यांनी लिलावात खरेदी केल्यामुळे तर हा दुरावा कित्येक मैल लांबवर गेला. राजकीय वैमनस्य पराकोटीला गेल्यामुळेच की काय जाहीरसभेच्या माध्यमातून ‘भुजबळ यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्यासमोर निवडणुकीला उभे राहावे’ असे खुले आव्हानही भुजबळ यांना दिले गेले. च्छगन भुजबळ नाही तर पुत्र पंकजला का असेना धूळ चारू या इर्षेने पेटलेल्या हिरे पुत्र अद्वयने नांदगावला भुजबळ यांची दमछाक केली. अखेर नांदगाव मतदारसंघात भुजबळ ‘हेवीवेट’च ठरले, पण राज्यातील सत्ता ताब्यातून गेली. भुजबळ यांचा राजकीय रुबाबही त्याबरोबर लयास गेला, तिकडे दाभाडी (सध्याच्या मालेगाव बाह्य) मतदारसंघावर पुन्हा घराण्याचे वैभव निर्मितीचे हिरे यांना स्वप्न पडू लागले. पंचायत राज असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हिरेंनी पाया बळकट करण्यास सुरुवात केली.
...ना वो रोब रहा, ना रुबाब !
By admin | Updated: March 31, 2017 01:10 IST