नाशिक : नाशिकचा तपमानाचा पारा चढता असून गुरूवारी (दि.२३) शहराचे कमाल तपमान ३८.१ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच बुधवारपासून शहराच्या तपमानात वाढ होऊ लागल्याने वातावरण अतिउष्ण होऊन नागरिकांच्या जीवांची लाहीलाही होत आहे.बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे ताप येण्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकेकाळी आरोग्यवर्धक हवामानासाठी नाशिक शहर ओळखले जात होते म्हणूनच अन्य शहरांमधून लोक हवा पालट करण्यासाठी नाशिकला पसंती देत होते; मात्र काळानुरूप शहराच्या हवामानाचे आरोग्य ढासळत असून नाशिकलाही उष्म्याचा वाढता त्रास मार्चअखेर नागरिकांना सहन करावा लागत आहे. ३मे २००२ साली नाशिकच्या कमाल तपमानाचा पारा सर्वाधिक ४३.९ अंश इतका नोंदविला गेला होता. हा उच्चांक राहिला असून पंधरा वर्षांमध्ये नाशिकरांनी कधीही एवढा प्रखर उन्हाळा अनुभवला नाही; मात्र यावर्षी मार्चमहिन्याचे सात दिवस शिल्लक असून पारा ३८ अंशापर्यंत पोहचल्याने उन्हाच्या तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. गेल्या वर्षीही मार्च महिन्यात कमाल तपमानाचा पारा ३७ अंशाच्या आसापास स्थिरावला आहे; मात्र त्यावेळी हवेचा वेग अधिक असल्याने शहरात उष्मा कमी जाणवत होता. यावर्षी हवेचा वेग कमी झाला असून तपमानाचा पारा चढता असल्याने उन्हाच्या झळा अधिक प्रखर वाटू लागल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या दिवस आणि रात्र हे प्रत्येकी बारा तासांचे आहे.येत्या सात दिवसांत हवेचा वेग न वाढल्यास आणि ढगाळ हवामान राहिल्यास पारा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी सकाळी आकाशात ढग जमा झाल्याने तपमानात वाढ झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.