संजय पाठक
नाशिक- नांदगाव मतदार संघातील शिंदे सेनेचे उमेदवार सुहास कांदे यांची शासनाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच बरोबर त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळवल्यानंतर भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यात भाजपाची सत्ता आणि नाशिकमधून तर पाच आमदार असून मंत्रीपद तर सोडाच साधे महामंडळ देखील मिळालेले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक मध्ये भाजपाचे पाच, राष्ट्रवादीचे सात तर शिंदे सेनेचे दोन आमदार आहेत. यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ॲड. माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री, नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळाले. दादा भुसे यांना सुरवातीलाच शालेय शिक्षण मंत्रीपद मिळाले. मात्र, भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे यांच्या नावाची केवळ चर्चाच होत राहीली. शिंदे सेनेचे दोनच आमदार असताना दोघांनाही मंत्रीपदाचा मान मिळाल्याने भाजपत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत कुरघोडीत जाणिवपूर्वक नाशिकमधील भाजपाच्या आमदारांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.