येवला : दुचाकीवरून घर गाठताना अचानक काळ आडवा आला अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले...या दुर्घटनेत येथील पहिलवान परिवारातील विजय यांचा अंत झाला. दुचाकी चालविताना डोक्यात हेल्मेट नव्हते म्हणूनच आपल्या कुंकवाच्या धन्याला प्राण गमवावा लागला याची जाणीव झालेल्या सीमा विजय पहिलवान यांनी दु:खाला आवर घालीत ११ दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप केले तेही विजय यांच्या धार्मिक विधीच्या दिवशी! दहा दिवसांपुर्वी नाशिकहून परतत असताना रस्त्यात आडव्या आलेल्या कुत्र्यास वाजविण्याच्या प्रयत्नात विजय पहिलवान यांच्या दुचाकीस अपघात झाला. या दुर्घटनेत विजय यांना प्राण गमवावा लागला तर सीमा गंभीर जखमी झाल्या. आपल्या दु:खाचे मूळ हेल्मेट न वापरण्यात असल्याची बाब सीमातार्इंच्या ध्यानात आली आणि अशी वेळ अन्य कोणावरही येऊ नये यासाठी प्रबोधन करण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी विजय यांच्या धार्मिक विधीच्या दिवशी ११ दुुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करून दुुचाकी चालविताना हेल्मेट वापरण्याची विनंती केली.