येवला : गेल्या२१ वर्षांपासून निसर्गाने साथ न दिल्याने अल्पपर्जन्यमान असले तरी कमी पाण्यात डाळिंबाची बाग फुलवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूलता साधली. कमी पाणी असूनसुद्धा शेतीत नवनवीन प्रयोग केले म्हणूनच सुखी जीवन जगत असल्याची प्रतिक्रिया उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त नेवरगाव, ता. येवला येथील शेतकरी सुरेश काशीनाथ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. कदम यांनी फलोत्पादन शेतीत भरीव कार्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना उद्यानपंडित पुरस्कार देऊन नुकतेच नाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविले. उत्तर महाराष्ट्रातून त्यांची एकमेव निवड झाली. स्वत:च्या दोन हेक्टर क्षेत्रात ‘गणेश १३७’ या जातीचे डाळिंबाची रोपे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून आणली व कमी पाण्यात डाळिंबाची बाग फुलवली. कांदा, फळपिके या सगळ्यांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करून मोठे उत्पन्न घेतले. पिके काढल्यानंतर फळांची प्रतवारी केली. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळाला. सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर केला, गांडूळखत, हिरवळीचे खत, बायोडायनामिक कंपोस्ट, जैविक खते व बुरशीनाशकांचाही वापर केल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहून भरघोस उत्पन्न मिळाल्याचे कदम यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन तंत्रज्ञान वापरून बाग फुलविली. मिरची, टमाटे, वांगी यांसह झेंडूची लागवड करून कमवलेल्या पैशामध्ये मुलांच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला. शेतीव्यवसायात खचून न जाता व आत्महत्त्येचा पळकु टा मार्ग न स्वीकारता कमी पाण्यातही शेती फुलवून सुखी जीवन जगू शकतो. हा आदर्शपाठ कदम यांनी घालून दिल्यामुळे परिसरात अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेऊन शेती करतात.कमी पाऊस पडतो म्हणून निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा प्रयोगशीलतेतून शेती करावी, असा सल्लाही शेतकऱ्यांना सुरेश कदम यांनी दिला आहे.(वार्ताहर)
कमी पाण्यात फुलवली डाळींबबाग
By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST