त्र्यंबकेश्वर : शहराची तहान ज्या पाण्यावर भागवली जाते त्या अंबोली धरणातील गाळ लोकसहभागातून तब्बल ३८ वर्षांनी काढण्यास सुरुवात झाली आहे.लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील काही युवा शेतकऱ्यांनी जेसीबी व ट्रकच्या साह्याने गाळ काढणे सुरू केले आहे. गाळ काढण्यासाठी अंबोलीचा कार्यभार असलेले वराटे व त्यांचे सहायक बी.जी. शिंदे यांची परवानगी घेण्यात आली होती. गाळ शेतात टाकण्याच्या अटीवर या कामास परवानगी देण्यात आली. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेश बहिरम यांनीही येथे भेट दिली आहे. पाण्याचे उद्भव खोल करणे व त्यातील चिखल गाळ, माती शेतीमध्ये टाकावयाची असल्यास तहसील कार्यालयाकडून अडवणूक केली जात नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. आज धरणातील पाणी तीव्र उन्हाने झपाट्याने कमी होत आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. उष्णतेच्या लाटांवर लाटा येत आहेत. त्यामुळे धरणसाठा आणखी कमी होणार आहे. वास्तविक त्र्यंबक नगरपालिकेनेदेखील गाळ काढण्यास सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
धरण बांधल्यापासून आजपर्यंत धरणातील गाळ कधीच काढण्यात आला नसल्याने हा गाळ (माती) शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतकरी स्वखर्चाने गाळाच्या ट्रक आपल्या शेतावर नेत आहेत. यासाठी असलेले जेसीबींच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस पाणी कमी होत असल्याने धरणातील माती-गाळ काढणे सुलभ होत आहे. त्र्यंबक नगरपालिकेने सध्या अहिल्या धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर गंगासागर तलाव, मुकुंद तलाव आदि तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. परिसरातील जलस्रोतातील गाळ काढण्याची कामे जलदगतीने हाती घेतली आहेत. त्र्यंबकेश्वरपासून ११ कि.मी. अंतरावर अंबोली बंधारा आहे. या बंधाऱ्यातूनच त्र्यंबकेश्वर शहराला १९८७-८८पासून पाणीपुरवठा होत आहे. अंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते विठोबा पाटील मेढे यांच्या सततच्या प्रयत्नाने अंबोली एमआय टॅँक मंजूर करून आणला. सन १९७२च्या दरम्यान या लघु पाटबंधाऱ्याचे काम सुरू झाले आणि १९७८ला धरण पूर्णत्वास आले. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.