वादळी पाऊस : ठिकठिकाणी पाण्याचे साचले तळेसातपूर : वादळीवार्यासह झालेल्या रोहिणीच्या पावसाने सातपूर परिसरातील शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान केले असून, जनजीवनही विस्कळीत झाले होते. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळीवार्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सातपूर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सातपूर गावातील शिवाजी मंडईतील भाजीपाला, फळविक्रेत्यांना चांगलाच फटका बसला. अर्ध्या तासाच्या पावसाने ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. त्र्यंबक रस्त्यावरील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा सर्कल, पद्मश्री बाबूभाई राठी चौक, पालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोर पावसाच्या पाण्याचे तळेच झाले होते. सातपूर कॉलनी रस्ताही पाण्यात बुडाला होता. पिंपळगाव बहुला येथील शेतकरी सोमनाथ नागरे यांच्या श्रमिकनगर येथील पॉली हाऊसचे वादळीवार्याने लाखोंचे नुकसान झाले, तर त्र्यंबक विद्यामंदिर येथील शेतकरी दत्तू ढगे यांच्याही पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाले. सातपूर औद्योगिक वसाहतीतील परफेक्ट वजन काट्याजवळील झाड उन्मळून पडले. शिवाजीनगरमधील जिजामाता कॉलनी, सातपूर-अंबड लिंकरोडवरही झाडे उन्मळून पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरील झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीला मोकळा केला.
सातपूरला लाखोंचे नुकसान
By admin | Updated: May 28, 2014 01:18 IST