पाडळडे : मालेगाव तालुक्यात पाडळदे परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतीच्या कामांना वेग आलेला आहे.खरीप हंगामाच्या दृष्टीने साधारणत: वीस-पंचवीस दिवसांपासून शेतकरी कामाला लागलेला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकामाला वेग आला आहे. मंगळवारी (दि.२) सकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.त्यामुळे थोड्याफार प्रमाणात गारवा वाढला.परिसरात पांढरं सोनं म्हणून प्रसिद्ध असलेले कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या दृष्टीने शेतीची मशागत करण्यात येत आहे.पन्नास टक्के शेतकऱ्यांची कपाशी पिकाच्या लागवडीसाठी जमीन तयार झालेली आहे.येथील पंचवीस ते तीस टक्के शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन कपाशीची लागवड करत असतात. इतर भागांमध्ये सिंचनाची सोय असल्यास कपाशीची लागवडमोठ्या प्रमाणात होते; परंतु पाडळदे परिसरात सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने पावसाच्या पाण्यावरच कपाशीचे पीक घेतले जाते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
पाडळदेत खरीप हंगामाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:12 IST