नाशिक : गेल्या महिनाभरापासून महापालिकेत चर्चेत असलेली बदल्यांची हंडी अखेर फुटली असून, पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बदलीजागेवर रुजू न झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक संवर्गातील, तर तिसऱ्या टप्प्यात वरिष्ठ-कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच जागेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर माहिती संकलनाची कार्यवाही सुरू होती. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने बदल्यांची हंडी एकदाची फोडली. पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सहायक आयुक्त, अधीक्षक, सहायक अधीक्षक, नाईक/दप्तरी, शिपाई, कनिष्ठ अभियंता विद्युत, इलेक्ट्रिशियन, मिस्तरी, रोड मुकादम, उद्यान निरीक्षक आणि हेड माळी यांचा समावेश आहे. बदल्यांच्या प्रक्रियेबाबत विजय पगार यांनी सांगितले की, ३० सप्टेंबर २०१५ रोजी ज्यांचा कालावधी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक झाला आहे, त्यांनाच बदलीपात्र ठरविण्यात आले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, नाईक/दप्तरी, शिपाई, बिगारी आदि पदांवरील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८० टक्के आढळून आली. परंतु कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून या पदांसाठी १२ वर्षे व त्यावरील कालावधी निश्चित करण्यात आला. सुमारे २२ संवर्गामध्ये १११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता, बिगारी, फायरमन, माळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या सुमारे ५३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या टप्प्यात येत्या १५ ते २० दिवसांत करण्यात येणार आहेत. सध्या करवसुलीवर परिणाम होऊ नये यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या संवर्गातील सुमारे ३५५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या तिसऱ्या टप्प्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहेत. सदर बदल्या करताना विभागनिहाय गरजेनुसार पदांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही पगार यांनी दिली. नगररचना विभागात ज्यांना पदे हवीत त्यांना जबाबदाऱ्याही पेलाव्या लागणार आहेत. त्यासाठी त्यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. येत्या ३० जानेवारीपर्यंत बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही पगार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
महापालिकेत खांदेपालट
By admin | Updated: January 25, 2016 23:03 IST