मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेचे गिरणा धरणातील गतवर्षाचे आरक्षित केलेले ५२५ दलघफू पाणी आरक्षण (मृतसाठा सोडून) कायम ठेवावे, अशी मागणी मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ४ नोव्हेंबर २०१५ रोजी जळगाव येथे मालेगाव शहरासाठी २०१५-२०१६ करिता गिरणा धरणातील पाणी आरक्षणाबाबत पाणीवाटप बैठकीत मालेगाव मनपातर्फे ८०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली होती. मात्र सदर बैठकीत गिरणा धरणावर जळगाव जिल्ह्यातील गावांसाठी उपलब्ध साठ्यातून गतवर्षीच्या मागणीपेक्षा दीडपट पाणी आरक्षण दांडगाईने मंजूर करण्यात आले. सध्या मालेगाव शहराची लोकसंख्या ७ लक्ष ३० हजार इतकी असून वाढीव गावांना सुद्धा याच आरक्षणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गिरणा धरणाचे पाण्याचे आरक्षण किंवा पाण्याचे वाटप याबाबत मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण यांचेकडे ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सुद्धा सदर मागणी कायम करण्यात आलेली होती. मात्र सदर बैठकीस जळगाव जिल्हाधिकारी किंवा पाटबंधारे विभाग जळगाव यांची माहिती उपलब्ध होऊ न शकल्याने सदर बैठक तहकूब करून १ डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आलेली असताना सुद्धा २५ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यास पाणी सोडण्यास सुरूवात केलेली आहे. त्यामुळे उद्या गुरूवार रोजी सवंदगाव फाटा महामार्ग क्रमांक ३ येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार आसिफ शेख यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)
गिरणा धरणातील पाणी आरक्षित ठेवा
By admin | Updated: November 25, 2015 23:15 IST