पंचवटी : राज्यभरातील गुंतवणूकदारांना तिप्पट व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या संशयित भाऊसाहेब चव्हाण याचे मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलशेजारी असलेल्या केबीसी कंपनीच्या कुलूपबंद कार्यालयास सोमवारी (दि़५) सायंकाळी अचानक आग लागली़ या आगीमध्ये कार्यालयातील टेबल जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे़ केबीसी फसवणूकप्रकरणी कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांच्यासह संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत़ केबीसी कंपनीच्या कार्यालयातून पोलिसांनी गुन्हे दाखल झाल्यानंतर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क तसेच रोख रक्कमही जप्त केलेली आहे़ सद्यस्थितीत सील करण्यात आलेल्या व कुलूपबंद असलेल्या या कार्यालयात आग लागल्याची घटना घडल्याने कार्यालयात आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत का? आणि नसतील आग लावण्याचा प्रयत्नाचे कारण काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे़ केबीसी कार्यालयास आग लागल्याची माहिती सिद्धार्थ अग्रवाल या इसमाने अग्निशमन दलास दिली होती़ (वार्ताहर)
केबीसी कार्यालयाला लागली आग
By admin | Updated: September 6, 2016 00:55 IST