नाशिक : राज्यभरात जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्याकडील ९० काटी ९१ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने राज्य सरकार विरोधात चक्क मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने शासनाने सर्व जिल्हा परिषदांना तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी त्यांच्या कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे कार्यासन अधिकारी र. ह. श्रावणपाटील यांनी आज (दि.८) याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच विभागीय उपआयुक्त यांना परिपत्रक पाठवून त्या त्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींकडील थकीत बाकी पत्र मिळाल्याच्या दिवशीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने त्यांच्या ९० कोटी ९१ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीबाबत रिट याचिका क्र. ६५७४/२०१३ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केली असून, त्यानुसार २८ एप्रिल २०१५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही थकबाकी संबंधित जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जमा करण्याबाबत आदेश दिले आहेत. याबाबत पुढील सुनावणी १० जून २०१५ रोजी होणार असल्याने शासनाने जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींना तत्काळ ही थकबाकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना दिले आहेत.(प्रतिनिधी)
नव्वद कोटींच्या थकबाकीसाठी जीवन प्राधिकरणाची न्यायालयात धाव
By admin | Updated: June 9, 2015 01:55 IST