नाशिकरोड : परिसरातआज दुपारी झालेल्या वादळी वार्यासह मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. जोरदार वार्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर विद्युतवाहिन्या तुटल्याने काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नाशिकरोड परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह पावसाचे आगमन झाले. प्रारंभी पावसापेक्षा वादळी वारेच जोर्यात वाहत असल्याने रस्त्यावर सर्वत्र धूळ उडत होती, तसेच रस्त्यावरील व मोकळ्या जागेवरील केरकचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदे, झाडाची पाने उडत होती. त्यानंतर मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने सर्व हमरस्ते निर्मनुष्य झाले होते. पादचारी, रस्त्यावरील विक्रेते, दुचाकी चालक यांनी आजूबाजूच्या इमारतींचा सहारा घेतला होता. वादळी वार्यामुळे वडनेररोड, भैरवनाथ मंदिर, विहितगाव, हांडोरे मळा व पाटील गॅरेजजवळील फडोळ चाळ येथे तीन झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. वादळी वार्यात लोंबणार्या विद्युतवाहिन्या तुटल्याने काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तासाभरानंतर पाऊस थांबल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने सर्वांचीच धावपळ उडाली होती. देवळाली कॅम्प, भगूर, संसरी, बेलतगव्हाण, शेवगेदारणा, राहुरी, दळवी, दोनवाडे, लहवित या ग्रामीण भागातदेखील वादळी वार्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकरीवर्गाची चांगलीच धावपळ उडाली होती. वादळी वार्यामुळे काही घराचे पत्रे व कौलं उडून गेल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली होती. पावसामुळे महावितरण विभागाची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)