शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर जेलभरोसुनील तटकरे : पिंपळगाव बसवंत शेतकरी मेळावा नाशिक : अच्छे दिन येणार म्हणून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना स्वप्न दाखवून सत्तेवर आलेले केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजिबात गंभीर नाही. राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यभर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी दिला. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार छगन भुजबळ होते. तसेच व्यासपीठावार विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, (पान ७ वर)आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार पंकज भुजबळ, आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, आ. दीपिका चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार आदि उपस्थित होते. सुनील तटकरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी दौऱ्यास सुरू केले असून, त्याअनुषंगाने राष्ट्रवादीनेही राज्यभर मेळावे घेतले आहेत. येत्या १४ सप्टेंबरला मराठवाड्यातील दुष्काळावर शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोेलन करण्यात येणार आहे. शेतकरी, तरुणांना आणि बेरोजगारांना काळे धन आणण्याचे अच्छे दिनचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात १० महिने झाले तरी ‘अच्छे दिन’ आलेच नाही. दुष्काळाचे गांभीर्य सरकारला उरलेले नाही. सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम सरकार करीत आहे. पुरवणी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरतूद हे सरकार करीत नाही आणि आम्हाला विचारतात, तुम्ही १५ वर्षे काय केले, आमचा सवाल आहे. तुम्ही दहा महिने उलटूनही शेतकऱ्यांसाठी काय केले? आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर जेलभरो आंदोलन उभारण्यात येणार आहे. लोकसभा आणि विधानसभेत पक्षाला आलेली मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. निरंजन डावखरे यांनी सांगितले की, निवडणुकीत अपयश येऊनही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थांबले नाहीत. आता राज्यभर दौरे करून पक्षाला आलेली मरगळ झटकून संघटन बांधणीचे काम सुरू आहे. आमदार जयंत जाधव यांनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेणे-देणे नसल्याचे सांगितले, तर आमदार नरहरी झिरवाळ यांनी रखडलेल्या वळण योजनांचे कामे मार्गी लावण्याचे आवाहन केले. डॉ. भारती पवार यांनी सरकार लोकोपयोगी योजना बंद करीत असल्याची टीका केली. सुरुवातीला प्रास्ताविकात दिलीप बनकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार काहीही उपाययोजना करीत नसल्याबाबत टीका केली. विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला शेतकरी म्हणवून घेतात, मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना अजूनही समजलेल्या नाही. गायीचे दूध काढण्यासाठी त्यांना म्हणे खाली बसता येत नाही. हे कसले आले शेतकरी. सध्या टीव्हीवरील सिरियलवर ‘होणार सून मी या घरची’ धारावाहिक सुरू आहे. त्यात गेल्या दीड वर्षापासून जान्हवी गरोदर असूनही त्यांच्या घरात ‘अच्छे दिन’ येत नाहीत. तीच गत देशाला अच्छे दिनची स्वप्ने दाखविणाऱ्या नरेंद्र भार्इंनी देशवासीयांनी केल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. सिल्लोड तालुक्यात एका भाकरीसाठी शेतकऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. परिस्थिती कुठे चालली आहे? शेतकऱ्यांमध्ये किती रोष वाढत आहे, याचे सरकारला काही घेणे देणे नाही. त्यामुळेच येत्या १४ सप्टेंबरला संपूर्ण मराठवाड्यात दीड शेतकरी आणि पक्षाचे कार्यकते गुरा-ढोरांसह जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची जाण असणारे एकमेव शासनकर्ते शरद पवार होते, असे सांगत आताच्या राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणे-देणे नसल्याची टीका केली. एलबीटीसाठी २५०० कोटींची आणि टोलमाफीसाठी ८०० कोटींची तरतूद करणारे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक दमडीही तरतूद करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शोभा मगर, महापालिका स्थायी सभापती शिवाजी चुंबळे, विरोधी पक्षनेते कविता कर्डक, दिलीप खैरे, उदय सांगळे, बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते, सोहनलाल भंडारी, शरद काळे, प्रभात पाटील, निवृत्ती धनवटे, विलास बोरस्ते, जि. प. सभापती उषा बच्छाव, छबू नागरे, सचिन पिंगळे, रंजन ठाकरे, सुनीता निमसे, प्रेरणा बलकवडे, तुकाराम पेखळे, विलास मत्सागर, शिवनाथ कडभाने, जि. प. सदस्य गोरख बोडके, नितीन पवार, शैलेश सूर्यवंशी, हिरामण खोसकर, महेश भामरे, अर्जुन मेंगाळ, अशोक तांबेरे, माजी आमदार संजय चव्हाण आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर जेलभरो
By admin | Updated: September 1, 2015 23:16 IST