घोटी : इगतपुरी तालुक्यात पाण्याचे स्त्रोत आटल्याने तालुक्यातील जनतेला तहान भागविण्यासाठी मिळेल त्या पाण्याचा वापर करावा लागत असल्याने हे दूषित पाणी पिल्याने साथीच्या आजारात प्रचंड वाढ झाली असून, घोटीतील ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तालुक्यातील पाण्याचे नमुने तपासणीची जबाबदारी असलेल्या घोटीतील पाणी तपासणी प्रयोगशाळेत तब्बल १४२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले मात्र एकाही ठिकाणी दूषित पाणी नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने शासनाला दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नदीलगत व धरणालगतच्या गावांना नदीपात्रात खड्डे खोडून मिळेल ते पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. या पाण्याचे निर्जंतुकरण होत नसल्याने या दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. दरम्यान या दूषित पाण्याचा वापर होत असल्याने जुलाब, अमांश व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली घोटीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, एकीकडे ग्रामीण रुग्णालयासह खासगी रु ग्णालयातही या आजाराचे अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असताना मात्र तालुक्यातील पाणी नमुने तपासणीची जबाबदारी असणाऱ्या पाणी तपासणी प्रयोगशाळेत एकही गावात दूषित पाणी नसल्याचा अजब अहवाल जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
साथीच्या आजारात वाढ
By admin | Updated: May 6, 2016 00:34 IST