नाशिक : शिक्षण हक्क कायद्यानुसार समाजातील वंचित घटकांसाठी आरक्षित असलेल्या पंचवीस टक्के आॅनलाइन प्रवेशात अद्यापही तांत्रिक अडथळे येत असून, या प्रवेशाची मुदत वाढवणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे पालकांना दिलासा लाभणार आहे.मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार सर्व खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात पंचवीस टक्के कोटा गरिबांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या कोट्यात गरिबांच्या मुलांना मोफत प्रवेश देणे चार वर्षांपासून शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील बहुतांश शाळांमधील पहिलीची प्रवेशप्रक्रिया जानेवारीमध्येच आटोपली असून, ७५ टक्के जागा भरण्यात आल्या आहेत. उर्वरित गरीब विद्यार्थ्यांसाठीच्या २५ टक्के जागा आॅनलाइन अर्जाद्वारे भरल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया ८ मार्चपासूनच सुरू होणार होती; मात्र संबंधित ‘आरटीई अॅडमिशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्न्मेंट’ या संकेतस्थळावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ही प्रक्रिया विलंबाने सुरू झाली. या प्रवेशासाठी १० एप्रिल ही मुदत ठेवण्यात आली होती; मात्र तांत्रिक अडचणी कायम असल्याने पालकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात सुमारे चार हजार दोनशे जागा असूनही अद्याप निम्म्याहून कमी विद्यार्थ्यांचेच अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या मुदतीत साधारणत: पाच दिवसांची वाढ केली जाणार असल्याचे वृत्त आहे; मात्र अद्याप तरी याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. पालकांच्या मागणीनुसार पुढील पाऊले उचलली जाणार आहेत.
शिक्षण हक्क प्रवेशाच्या मुदतीत होणार वाढ
By admin | Updated: April 5, 2016 23:23 IST