पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मधील हिरावाडी (अयोध्यानगरी) भागात राहणार्या काही नागरिकांनी घरासमोर अनधिकृतपणे पक्के बांधकाम केलेले असले, तरी प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अयोध्यानगरी, कळसकरनगर, सिद्धिविनायक टाऊनशिप या भागात राहणार्या काही बंगलेधारकांनी घराच्या दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकाम केलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपूर्वी हे बांधकाम केलेले असले, तरी त्याकडे नगररचना तसेच अतिक्रमण व बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही नागरिकांनी तर मनपाचे तसेच वीज वितरणच्या पोलाभोवती संरक्षित भिंती घालून त्या जागा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. विना परवाना वाढीव बांधकाम केले असताना प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने वाढीव बांधकामांना मनपाच्या अधिकार्यांनीच परवानगी दिल्याची चर्चा असून, वाढीव बांधकाम करणार्यांवर अधिकारी मेहरबान असल्यानेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार परिसरातीलच स्थानिक नागरिकांनी केली आहे. याशिवाय स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल रस्ता काही दिवसांपूर्वीच रुंदीकरण करण्यात आला. त्याठिकाणी पाटाच्या पुलाजवळ वसाहत असून, यातील काहींनी पत्र्याचे शेड टाकून मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण केलेले आहे; मात्र त्याकडेही प्रशासन डोळेझाक करीत आहे. (वार्ताहर)