नांदगाव : सगळ्याच प्रश्नाकडे तटस्थपणे बघणाऱ्या प्रशासनाने पिण्याच्या पाण्यापाठोपाठ आता जनावरांना मुबलक चारा उपलब्ध असल्याच्या दावा आपल्या अहवालात दिल्याने आता जणू दुष्काळाची स्थिती नाही अशा थाटात नामनिराळे होण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने चारा-पाण्याची मागणी घेऊन आलेल्या गरजू शेतकऱ्यांना हताश होण्याची वेळ आली आहे. प्रशासन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी सब कुछ आलबेल असल्याची बतावणी करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे. एरवी कागदी घोडे नाचविणारे प्रशासन पाणी चाऱ्याच्या मुद्द्यावरदेखील संवेदनशील नसल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळाची भीषण दाहकता समोर असताना केवळ सोपस्काराच्या भूमिकेत वावरताना धन्यता मानताना दिसत आहे. विशेष म्हणजे तालुक्यात चाऱ्याची जणू गरजच नसल्याचे दाखविताना ४१ हजार मेट्रिक टन चारा तालुक्यात उपलब्ध असून, तो ३६८ दिवस पुरेल असा तालुका कृषी कार्यालयाच्या व पशुधन विकास विभागाचे हवाल्याने असा अहवाल नांदगावच्या तहसीलदारांना दिला आहे, तर दुसरीकडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नांदगाव तालुक्यात ८६ हजार लहान मोठ्या जनावरांसाठी प्रतिमाह १४ हजार ९६३ मेट्रिक टन चारा सध्या १ लाख ४४ हजार मेट्रिक टन चारा असल्याचे म्हटले आहे. एकाच विषयावर असे परस्परविरोधी अहवाल असले तरी त्यात एक समानता आहे. ती म्हणजे तालुक्यात चारा उपलब्ध असल्याची. प्रत्यक्षात तालुक्यात चाऱ्याची काय अवस्था आहे हे नांदगावच्या तहसीलदाराकडे याबाबतीत नोंदविलेल्या मागणीवरून लक्षात यावे. तालुक्याच्या पानेवाडी, नागापूर, धोटाणे, कऱ्ही, जोंधळवाडी, अस्तगाव, शास्त्रीनगर यांसह विविध गावातील शंभरहून शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यापासूनच आपल्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याची मागणी नोंदविले मात्र शासकीय नियमाचा बागुलबुवा उभा करीत शेतकऱ्यांना अडचणींचा पाढा वाचत प्रशासनाने त्यांना झुलते ठेवले आहे. सध्या मिळेल त्या ठिकाणाहून चारा आणावा लागत आहे. चारा आणि पाणीटंचाईने तोंड वर काढल्याने तालुक्यातील शेळ्या-मेंढ्यासह लहान-मोठ्या जनावरांचे हाल सुरू आहेत. पशुधन जगविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असला तरी मेंढपाळांसह पशुपालकांना चारा आणि पाण्याची सोय करताना नाकी नऊ आले आहे. तालुक्यातील चाऱ्याचे सर्व स्त्रोत संपले असून, अपवाद वगळता सर्वत्र विकतचा चारा घेऊनच जनावरे वाचविण्याची वेळ आली आहे. शेळ्या-मेंढ्यावगळता लहान जनावरांना प्रतिदिन साडेसात किलो चारा लागतो तर मोठ्या जनावरांना प्रतिदिन पंधरा ते वीस किलो चारा गरजेचा आहे. केवळ ८६ हजार लहानमोठ्या जनावरांचा विचार करता तालुक्यात दररोज १२ लाख ते तेरा लाख किलो इतका चारा अपेक्षित आहे. तर लहान जनावरांना प्रतिदिन ४० लिटर तर मोठ्या जनावरांना ८० लिटर इतके पाणी लागते पाण्याच्या या गणितीनुसार चाळीस ते पन्नास लाख लिटर पाणी हवे आहे प्रत्यक्षात सध्या माणसाना पाणी देतानाच खळखळ करणाऱ्या प्रशासन जनावरांना पाणी देताना नियमनाचा अडथळा आणताना दिसत आहे. त्यासाठी परिपत्रकांचा आधार घ्यावा लागत आहे. नांदगाव तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न किती उग्र बनला आहे याचा दाहक अनुभव तालुक्यातील भालूर येथे दिसून आला. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना आता जनावरांच्या चाऱ्यासोबत पाण्याची मागणी आता वाढू लागली आहे. भालूर गावात जनावरासाठी चक्क केळीचे कंद मागवून जनावरांची वैरणीची सोय करावी लागत असल्याचे बघावयास मिळत आहे. उसाचा भाव परवडत नसल्याने केळी कंद वापरण्याची वेळ भालूरचे शेतकरी गोविंद तळेकर यांच्यावर आली. तळेकर यांच्याकडे सध्या जेमतेम कडबा शिल्लक असल्याने चाळीसगावजवळील नागद (ता. कन्नड) येथून केळीचे कंद आणावे लागत आहे तर आज तहसीलदार गवांदे यांना संतप्त महिलांचा अनुभव घ्यावा लागला. जतपुरा रस्त्याकडील गवळी वस्तीवरच्या महिला तहसीलदार गवांदे यांना आमची जनावरे जगवायची कशी असा सवाल करीत जनावरे तहसील आवारात आणून सोडू असे सांगत होत्या. एकूणच तालुक्यातील मुक्या जनावरांचा हंबरडा कुणाला ऐकू जाणार असा प्रश्न मात्र उभा राहिला आहे. (वार्ताहर)
मुक्या जनावरांचा चाऱ्यासाठी हंबरडा
By admin | Updated: May 6, 2016 00:33 IST