नाशिक : ग्रामीण भागातील टपाल कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुनर्निर्धारण समिती स्थापन करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यामुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत, आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनने १० मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी टपाल कर्मचाऱ्यांनी संप केला असता, केंद्र सरकारने माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण डाक वेतन समिती स्थापन करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते; परंतु आता घुमजाव करीत, अधिकारी प्रमख असलेली वेतन समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डाक सेवकांना न्याय मिळणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात असून, सर्व ग्रामीण डाक सेवकांना त्वरित खात्यात समाविष्ठ करावे, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वेतनात सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती प्रमुख असलेली समिती स्थापन करावी, प्रस्तावित खासगीकरण बंद करावे आदि मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे युनियनने म्हटले आहे.
ग्रामीण डाकसेवक मंगळवारपासून संपावर
By admin | Updated: March 6, 2015 23:59 IST