नाशिक : अतिवृष्टी, गारपीट व सातत्याने दुष्काळी परिस्थितीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सरकारने निर्णय घेतला असून, रोजगार हमी योजना, जलयुक्ती भूमी अभियान अशा कायम स्वरूपी व तात्पुरत्या योजना राबवितानाच पीकपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, प्रतिपादन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. शासकीय विश्रामगृहावर खडसे यांच्या उपस्थितीत महसूल, मदत व कार्य, पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास, कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, राज्य उत्पादन शुल्क या विभागाची बैठक घेण्यात आली. त्यात खडसे यांनी प्रत्येक विभागात सध्या सुरू असलेले काम व त्यात येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना खडसे यांनी, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी स्थायी व्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, राष्ट्रीय फळबाग योजना, पीक विमा योजना,नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, वीजबिल माफी, जलसंधारण हे कामे करण्याबरोबरच शाश्वत शेतीसारख्या उपाययोजना अंमलात आणल्या जातील. त्यासाठी नवीन धोरण स्वीकारण्यात येत असून, सरकार स्वयंसेवी संस्था, वित्तसंस्था, विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहे. प्रामुख्याने अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना कर्ज व अडचणीतून सोडविण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील. त्यामध्ये नॅशनल हार्टीकल्चर मिशन, फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना,पीकपद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी कृषी संशोधन आणि कृषी मालाच्या विक्रीसाठी आडत व्यापारी, बाजार समिती यांच्याशी विचार विनिमय करून उपाययोजना आखल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदि अधिकारी उपस्थित होते.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी महसूलमंत्र्यांचा दिलासा : पीकपद्धतीत बदल
By admin | Updated: December 30, 2014 00:18 IST