नाशिक : पखालरोड मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी पावसासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत प्रार्थना केली. विविध वेशभूषा केलेले डोक्यावर कलश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परिसरातून फेरी काढण्यात आली. नवीन ज्ञानरचनावाद सिद्धतानुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमातील कविता विद्यार्थ्यांनी कृतीद्वारे सादर केली. एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना याद्वारे मिळाला.जून महिना कोरडाच गेला. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. अशा वेळी पाऊस पडावा म्हणून विद्यार्थ्यांनी कृतीद्वारे प्रार्थना केली. खान्देशात पाणी मागण्याची पद्धत आहे. जणूकाही संस्कृतीचे दर्शन यानिमित्ताने घडले. हा उपक्रम सांस्कृतिक प्रमुख विद्या महाजन, मुख्याध्यापक सुनील शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता महाजन, ज्योती महाले, वैशाली राजभोज, जयश्री पवार यांनी राबविला. यावेळी विद्यार्थ्यांनी पावसावरील विविध कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने या अनोख्या उपक्रमात भाग घेतला. यावेळी मोहन माळी, प्रकाश खैरनार, प्रशांत गवळी यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘धोंडी धोंडी पाणी दे’
By admin | Updated: July 7, 2014 00:07 IST