नाशिक : आरोग्यपूर्ण जीवनात पचनसंस्थेचे कार्य महत्त्वाचे असून, त्याविषयी मौलिक ज्ञान आयुर्वेदात आहे. आयुर्वेदाचे पालन केल्यास आरोग्य चांगले व सुदृढ राहते, असे प्रतिपादन मुंबई येथील सहायक आयुर्वेद संचालक व प्रख्यात वैद्य व्यंकट धर्माधिकारी यांनी केले. आयुर्वेद सेवा संघाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात धर्माधिकारी बोलत होते. गणेशवाडी, पंचवटी येथील आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयातील पद्व्युत्तर विभागातर्फे पचनसंस्था या विषयावर ‘महास्त्रोतस २०१६’ या एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना धर्माधिकारी यांनी आयुर्वेदाचे जीवनातील महत्त्व आणि पचनसंस्थेतील अग्नितत्त्व स्पष्ट केले. दरम्यान, सकाळी या परिसंवादाचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा. फरांदे म्हणाल्या की, आयुर्वेद ही भारताची प्राचीन वैद्यकीय चिकित्सापद्धती असून, आधुनिक काळात त्याच्या गुणवत्ता प्रामाणिकरणाबाबत संशोधन होण्याची गरज आहे. आयुर्वेद शास्त्रामुळे जगात भारताचा नावलौकिक वाढत असून, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. प्रारंभी वैद्य रजनी गोखले यांनी प्रास्ताविक केले. शरद पाठक यांनी आयुर्वेद सेवा संघाबद्दल माहिती सांगितली. आयुर्वेद पत्रिका महोस्त्रोतस-२०१६ विशेषकांचे प्रकाशन प्रा. फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन वैद्य शीतल चव्हाण यांनी केले वैद्य अभय कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास वैद्य मा. द. राजपाठक, डॉ. य. म. बर्वे, डॉ. दिनकर केळकर, डॉ. एस. एल. दासरी, वैद्य एकनाथ कुलकर्णी, राजन कुलकर्णी, पंकज दीक्षित, अर्चना भास्करवार, संतोष पाठक आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आरोग्यपूर्ण जीवनात पचनसंस्थेचे कार्य महत्त्वाचे
By admin | Updated: January 10, 2016 23:43 IST