नाशिक : विदर्भात आणि खान्देशात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीचा फटका जिल्ह्यातील मालेगाव, देवळा व नांदगाव तालुक्याला बसला आहे. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले असले तरी वीज पडून दोन बैल व दोन शेळ्या दगावल्याचे वृत्त आहे.दरम्यान, शुक्रवारीही (दि. ६) जिल्ह्यात कसमा पट्ट्यातील देवळा, कळवणसह काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. ५ मे रोजी मालेगाव तालुक्यात २० मिमी. अवकाळी पावसाची नोेंद करण्यात आली. त्यात मौजे वडेल, करंजगव्हाण, अजंग, कुकाणे, चिंचवड, लुल्ले व गाळणे येथे तुरळक स्वरूपात पाऊस व गारपीट झाली. परंतु या गावच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने पाऊस मोजता आला नाही; मात्र करंजगव्हाण या मंडळात २० मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी येथील परसराम नारायण बागुल यांचा एक बैल वीज पडून ठार झाला. तसेच मौजे कळमदरी येथे नीलेश हरी पगार यांच्या दोन शेळ्या गारा पडून मयत झाल्या. या गावातही पर्जन्यमापक यंत्र नसल्याने पाऊस मोजता आला नाही. देवळा तालुक्यातील मौजे निंबोळा येथे वादळी वाऱ्याने झाड पडून एक बैल मयत झाला. शुक्रवारीही दुसऱ्या दिवशी कळवण, देवळ्यासह कसमा पट्ट्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते.
जिल्ह्यात अवकाळीमुळे चार जनावरे दगावली
By admin | Updated: May 7, 2016 00:02 IST