न्यायडोंगरी : परधाडी (ता. नांदगाव) येथील चार एकर शेतात उभा असलेला ऊस जळून खाक झाला असून, सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे. तलाठी येवले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परधाडी येथील शेतकरी पोपट नामदेव गायकवाड यांनी आपल्या चार एकर शेतात डिसेंबर महिन्यात ऊस लावला होता. पाणी जेमतेम असल्याने या ठिकाणी तीन लाख रुपये खर्चून ठिबक बसविले होते. चार महिने हा ऊस जतन केला. शनिवारी दुपारी दीड वाजेदरम्यान शेताच्या बांधावरील विद्युत रोहित्राच्या जवळून अचानक आग लागल्याची माहिती मजूर देवानंद सोनवणे यांनी दिली. आग लगल्याचे लक्षात येताच मालकाकडे धाव घेतली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. आग नियंत्रणात आणण्यात अपयश येऊन उभा असलेला ऊस व संपूर्ण ठिबक जळून खाक झाली. या घटनेची माहिती महसूल विभागास मिळताच तलाठी येवले यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा करून वरिष्ठांकडे तसा अहवाल सादर केला आहे. रोहित्राच्या बिघाडामुळेच ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. या आगीत चार लाख रुपयांचा उस व तीन लाख रु पयांचा ठिबक संच असे सात लाख रु पयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर )
चार एकर ऊस जळून खाक
By admin | Updated: April 24, 2016 23:14 IST