कळवाडी : मालेगाव तालुक्यातील साकुरी येथे रमाबाई आंबेडकर नगरात रात्रीच्या सुमारास शेतातील झापास आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे अमृत बागुल यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून, त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.साकुरी येथील रमाबाई आंबेडकर नगरात अमृत बागुल हे आपल्या कुटुंबीयांसह शेतात राहतात. शुक्रवारी रात्री विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांनी गोडतेलाचा दिवा लावून बागुल कुटुंबीय झोपी गेले. मध्यरात्री अचानक झापास आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासह जीव वाचविण्यासाठी झापाबाहेर धाव घेतली. यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. आगीने उग्ररूप धारण केले होते. झापात त्यांनी संसारोपयोगी साहित्य, रासायनिक खते, गहू, मका, बाजरी, कडधान्य आदि साठवून ठेवले होते. आगीत सर्व जळून खाक झाले. उंदराने पेटत्या दिव्याची वात ओढून नेल्याने आग लागली असावी, अशी ग्रामस्थांत चर्चा आहे. याप्रकरणी पंचनामा करण्यात आला. शासनाने बागुल कुटुंबीयास शासकीय मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील रमाबाई आंबेडकरनगरात आग लागून झाप खाक झाल्याने उघड्यावर आलेले बागुल कुटुंबीय.
साकुरी येथे आग लागून झाप खाक
By admin | Updated: April 8, 2017 23:27 IST