दिंडोरी तास : पाइपलाइन गळतीमुळे पाण्याचा अपव्ययदुष्काळात दुर्लक्ष केल्याने संतापनिफाड : निफाडच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते म्हणून शासनाने लासलागावसह १६ गावांना दिलेल्या पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन दिंडोरी (तास) शिवाराजवळ सुमारे महिनाभरापासून फुटलेली आहे. यातून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आणून देऊनही याबाबतीत कोणतेही गांभीर्य दाखविले जात नसल्याचे चित्र ढिम्म शासकीय यंत्रणेकडून दिसत आहे.एकीकडे मराठवाड्याकडे जाणारे पाणी अडवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आंदोलन करत असताना, नांदूरमधमेश्वर धरणातून लासलगावसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटते आणि हा प्रकार लक्षात आणून देऊनही शासकीय यंत्रणा कोणतीही कार्यवाही करत नाही, अशी खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. पाइपलाइन फुटल्यामुळे शेकडो लिटर पाणी तर वाया जातेच; शिवाय ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाइपलाइन गेली त्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उद्ध्वस्त होऊन दुहेरी नुकसान होत आहे.नांदूरमधमेश्वर धरण परिसर, दिंडोरी (तास) शिवार, गाजरवाडी शिवारात जमिनीखालून जेथे पाइपलाइन जाते तेथे पाण्याचा दाब येऊन नेहमीच पाइपलाइन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे या नुकसानीकडे दुर्लक्ष होत आहे.दोन वर्षांपूर्वी गाजरवाडी येथील कुदळ वस्तीवर पाइपलाइनचे पाणी द्राक्षबागेत शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दिंडोरी शिवारात आबासाहेब तासकर यांच्या घराजवळ वर्षभरापासून पाइपलाइन फुटल्याने घराच्या भिंतीला तडे गेले आहेत. दिंडोरी तास शिवारातील नानासाहेब शिरसाठ यांच्या शेतात महिनाभरापासून १६ गाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन फुटल्याने त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने मका पीक सोंगता आले नाही, तर मागच्या हंगामात याच ठिकाणी पाइपलाइन फुटल्याने उसाचे उभे पीक ३/४ महिने उशिरा तोडणीस द्यावे लागले. संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊनही ते डोळेझाकपणा करत आहेत. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा सामना करावा लागेल. (वार्ताहर)
दुष्काळात दुर्लक्ष केल्याने संताप
By admin | Updated: November 18, 2015 23:02 IST