येवला : कांद्याचे भाव कमालीचे घसरले असून, या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी चार दिवस संपावर जाणार असून, येवला मार्केट येथे कांदा शुक्रवारपासून (दि. ६) विक्रीसाठी आणणार नसल्याची माहिती शेतकरी संघटना नेते संतु पाटील झांबरे यानी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या शेतकऱ्यांच्या अनौपचारिक सभेत दिली. बुधवारी सकाळी १० वाजता ही सभा घेण्यात आली. यावेळी शेतकरी व व्यापारीवर्गाशी चर्चा करण्यात आली. धुणीभांडी करणाऱ्या महिलापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वजण संप करतात तर मग शेतकऱ्यांनी संप का करू नये, असे मत पुणतांबा येथील कार्यकर्ते धनंजय धोर्डे पाटील यानी येथे मांडले. नगर जिल्ह्यात राहता, श्रीरामपूर येथे हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला व नंतर शंभर रुपये भाववाढ झाल्याचा अनुभव सांगितला.दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळून निघाल्याचा अनुभव आपण घेत आहोत. शेतकऱ्यांनी जमेल त्यागावी जाऊन पाणी आहे तेथे आपले उन्हाळ कांद्याचे रोप नेऊन शेतीमालकाला एकरी पंचवीस ते तीस हजार रु पये दिले आणि कांदा लागवड केली. लागवडीसाठी टोळी, रोप घेऊन जाणे, पाणी भरण्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च अशी सर्कस करूनही आज काद्याला केवळ पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल भाव आहे. कांद्याच्या काढणी व साठवण याचा खर्चदेखील फिटत नाही. प्रतिक्विंटल १००० रु पये खर्च येतो. उत्पन्न प्रतिक्विंटल ५०० रुपये घ्यायचे हा कुठला धंदा असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. (वार्ताहर)
शेतकरी संघटना आजपासून कांद्याप्रश्नी संपावर
By admin | Updated: May 5, 2016 22:36 IST