धोंडगव्हाण येथील शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण येथील भाऊसाहेब केदू आवारे (४८) या शेतकऱ्यांचा विद्युतपंप चालू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. दुर्घटनेमुळे धोंडगव्हाण गावात शोककळा पसरली, तर महिलांनी आज वटसवित्री पौणिमेचा सणही साजरा केला नाही. धोंडगव्हाण येथील भाऊसाहेब केदू आवारे (४८) हे आपल्या शेतातील शेतीपंप चालू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. महिलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा,अशी आख्यायिका असलेल्या वटपौणिमेच्या दिवशीच मनमिळाऊ असलेले आवारे हे शेतीचे काम करून ग्रामपंचायतीत तात्पुरता स्वरूपात पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गावाला दररोज पाणी पाजणारे आवारे यांच्या निधनाने गावातील महिलांनी वडाची पूजादेखील केली नाही. घटनास्थळी तातडीने पोलीस कर्मचारी अनिल जगताप, पुंडलिक शिंदे, तलाठी माणिक तिडके, महावितरणचे कनिष्ठ अभियंता डोंगरे यांनी भेट दिली पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर आवारे यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून असा परिवार आहे. वडनेरभैरव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (वार्ताहर)
धोंडगव्हाण येथील शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू
By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST