शहरात सर्वत्र विजेचा लपंडाव सुरूचमहावितरणचा बोजवारा : तक्रार निवारण दूरध्वनी सेवा कूचकामीनाशिक : पाऊस पडल्याचे निमित्त होते आणि लगेचच वीजपुरवठा खंडित. महावितरणच्या गलथान कारभाराचा शहरात सर्वत्रच अनुभव येत असून तक्रार करण्यासाठी संबंधित अधिकारी दूरध्वनीही उचलत नसल्याने ग्राहकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी महात्मानगर, पारिजातनगर या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यानंतर मंगळवारी शहराच्या मध्यवस्तीत असा अनुभव आला. मेनरोड आणि अन्य भागात वीजपुरवठा सुरळीत झाला तर वकीलवाडी परिसरात दुपारी वीजपुरवठा बंद असल्याने खासगी आस्थापनांचे काम ठप्प झाले होते. विशेष म्हणजे भद्रकाली उपकार्यालयात दूरध्वनी उचलला जात नाही आणि तक्रार केलीच तर उर्मट उत्तरे दिली जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सातपूर भागातही उपकेंद्रांवर फोन उचलला जात नाही आणि हेल्पलाइन नंबरवर फोन केल्यास तो कायम व्यस्त असतो. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी कामे करण्यासाठी दोन दोन महिने आठवड्यातून एकदा याच पध्दतीने वीजपुरवठा खंडित केला जात होता, मग पावसाळापूर्व कामे करूनही पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असेल तर महावितरणच्या कामाचा दर्जा काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्वणी कालावधीत तर भाविकांची सातत्याने गर्दी राहणार आहेच, शिवाय भाविकांना सूचनादी कामे ज्या यंत्रणेवर आधारित आहे ती विजेवर चालणारी आहे, अशा स्थितीत विजेने खेळखंडोबा केल्यास आणि त्यातून काही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
शहरात सर्वत्र विजेचा लपंडाव सुरूच
By admin | Updated: July 28, 2015 22:43 IST