रेडगाव खुर्द : काहीसे साठवून ठेवलेले पाणी व सिंचनाचा वापर करून आज ना उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली. परंतु रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे जाऊन पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने शेकडो एकरावरील टमाटा लागवड धोक्यात आली आहे.चांदवड तालुक्यात तुलनेने अधिक पाऊस होणाऱ्या व भक्कम पाटपाण्याची सुविधा असलेल्या काही गावांचा परिसर वगळता इतरत्र पाणीटंचाई आहे. कांदा लागवडीसह पुढील हंगामासाठी टमाट्याचा चांगला आधार मिळू शकतो. त्यातच मागणीपेक्षा कमी पुरवठ्याच्या काळातील चांगला भाव पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी लवकर लागवड करण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आज ना उद्या पाऊस नक्की येईल, या दुर्दम्य आशेवर शेततळे व विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्याच्या आधारे सूक्ष्म सिंचनाचा वापर करून टमाटा लागवड केली.अनेकांनी तर विकत पाणी घऊन लागवड केली. परंतु पावसाने हवामानतज्ज्ञाचा पाच दिवस उशिरा मान्सून येणार हा हवाला खोटा ठरवत रोहिणी व मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले आहे.यादरम्यान अनेकांचे साठवून ठेवलेले पाणी संपले आहे. ज्यांच्याकडे थोडेफार शिल्लक आहे. ते दोनपाच मिनिटे सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देऊन टमाटा जगवण्याचा जीवापाड प्रयत्न करीत आहे. या दरम्यान, आधीच पाण्याची कमी त्यात वाढलेले तपमान, आजूबाजूची तापलेली जमीन, सोसाट्याचा वारा यामुळे लागवड केलेले टमाट्याची रोपे कोमेजत आहे. वाढ खुंटली आहे. तसेच पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावासह इतर रोगांना टमाट्याची लागवड बळी पडत आहे. एकूणच पावसाअभावी शेकडो एकरावरील टमाट्याची लागवड धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांचा खर्च व कष्ट वाया जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पावसाअभावी टमाटा लागवड धोक्यात
By admin | Updated: June 24, 2014 00:26 IST