सिन्नर : तालुक्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील भाजीपालावर्गीय पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र उशिराच्या पावसाने केवळ बाजरी व सोयाबीन या पिकांच्याच पेरणीवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यात यंदा खरीप हंगामाचे ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तथापि, १५ जुलैपर्यंत पेरण्या झाल्या असत्या तर उद्दिष्टापर्यंत पोहोचने शक्य झाले असते. तथापि, पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. तालुक्यात रोहिणी, मृग, आर्द्रा ही पावसाची व महत्त्वाची नक्षत्रे ठणठणीत कोरडी गेल्याने खरीप हंगामातील पेरण्या वेळेवर होऊ शकल्या नाहीत. सध्या सुरू असलेला रिमझिम पाऊस तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अधिक आहे. अद्यापही पूर्व भागातील अनेक गावांना पावसाची प्रतीक्षा आहे. पेरण्या खोळंबल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने घाई करीत पेरण्यांवर भर दिला आहे. पूर्व भागात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांची तहान केवळ शासनाच्या टँकरवर भागवावी लागते आहे. तालुक्यात ३०० टँकर सुरू आहेत. त्यातील सर्वाधिक टँकरची संख्या पूर्व भागातच आहे. त्यामुळे पूर्व भागातील ग्रामस्थांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पश्चिम पट्ट्यातील अकोले तालुक्यातील पाचपट्टा भागातील विश्रामगड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने म्हाळुंगी नदीला पाणी आले आहे. तालुक्यातील एकमेव नदीच प्रवाहित होऊ शकली आहे. अद्याप दुसऱ्या एकाही नदीला पाणी आले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर विविध पिकांची रोपे टाकली होती. त्यांची लागवड करण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे. या पावसाचा फायदा केवळ भाजीपालावर्गीय पिकांनाच होऊ शकला आहे. (वार्ताहर)
पावसाने पिकांना संजीवनी
By admin | Updated: August 1, 2014 01:13 IST