नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून नाशिक, त्र्यंबकेश्वरसह पश्चिम पट्ट्यात हजेरी लावली. सायंकाळपर्यंत पश्चिम पट्ट्यात पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या, तर नेहमीप्रमाणे येवला, नांदगाव व मालेगाव, निफाडच्या बहुतांश भागाला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६५.८ मिलीमीटर म्हणजेच सरासरी ४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये ही नोेंद पुढीलप्रमाणे - नाशिक - ४, इगतपुरी - २६, दिंडोरी - ००, पेठ - २५.३, त्र्यंबकेश्वर - ४, मालेगाव - ००, नांदगाव - ००, चांदवड - ००, कळवण - १.३, बागलाण - ००, सुरगाणा - ५.२, देवळा - ००, निफाड - ००, सिन्नर - ००, येवला - ०० असा एकूण - ६५.८ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. काल (दि.२५) दुपारनंतर येवला तालुक्यातील काही भागांत हलक्या स्वरूपातील पावसाला सुरुवात झाली, तर दुपारनंतर बागलाण तालुक्यातही काही गावांमध्ये दमदार पाऊस झाला. दिंडोरी तालुक्यातही सकाळपासून तुरळक व काही भागांत मध्यम स्वरूपात पाऊस सुरू झाला. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा व नाशिक तालुक्यात मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी (दि.२५) सायंकाळपर्यंत नाशिक शहरात ८.४ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. खरिपासाठी अद्यापही जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची अपेक्षा आहे. धरणसाठ्यांमध्येही जेमतेमच पाणीसाठा असल्याने धरणसाठ्यांमध्ये पाणी येण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला,
By admin | Updated: August 26, 2015 00:06 IST