नाशिक : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नाशिक तालुक्यातील केवळ पावसाने झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. वस्तुत: अतिवृष्टीमुळे गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील २४५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे तत्काळ पंचनामे करण्याचा ठराव पंचायत समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला.सभापती मंदाबाई निकम यांच्यासह उपसभापती अनिल ढिकले, पंचायत समिती सदस्य प्रकाश बदादे, धनाजी पाटील, शोभा लोहकरे, सुजाता रूपवते, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची मासिक बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यात आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतीचे २४५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. त्यातील ३३ टक्क्यांच्या आतील गोेदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेलेल्या शेतीचे व शेतपिकांच्या नुकसानीचा त्यात समावेश नसल्याने कालवी, लाखलगाव सह अन्य गावांचे दुबार नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपसभापती अनिल ढिकले यांनी बैठकीत दिले. त्यानुसार या पुरामुळे वाहून गेलेल्या संबंधित गावातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहे. तालुक्यातील १० ते १२ पाणीपुरवठा योजना अपूर्ण असून त्यापैकी काही ग्राम पाणीपुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहणाऱ्या संबंधित दोषींविरोधातही फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत सदस्यांनी केल्या. एकलहरे येथे गोदावरी नदीच्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे दारणा नदीतून ७ ते ८ किलोमीटर अंतरावरून नव्याने पाण्याचा उद्भव घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा योजना राबविली आहे. त्याच धर्तीवर मांडसांगवी, शिलापूर, ओढा येथेही गोदावरीचे प्रदूषित पाणी असल्याने नवीन पाणी उद्भव घेऊन योजना राबविण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच रमाई आवास योजनेच्या धर्तीवर आता अनूसूचित जमाती संवर्गातील दारिद्र्य रेषेखाली व रेषेवरील सर्व लाभार्थींना शबरी घरकुल योजनेतून लाभ देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)
अतिवृष्टीतील शेती नुकसानीचे दुबार पंचनामे
By admin | Updated: September 10, 2016 01:38 IST