मनमाड : निधीअभावी मांजरपाडा-१ प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून बंद असून, भविष्यात तीन वर्षांपर्यंत मांजरपाड्याच्या पाण्याचा एक थेंबही शेतकरी जनतेला मिळणार नसल्याचा अंदाज आहे, अशी परिस्थिती असताना निवडणुकीच्या तोंडावर मांजरपाड्याच्या पाण्याचे गाजर दाखवून जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे आवाहन नांदगाव व चांदवड तालुका जलहक्क संग्राम परिषद व मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्वांत जास्त पाणीटंचाई होरपळ सोसणाऱ्या चांदवड तालुका (पूर्व) व मनमाडसह नांदगाव तालुक्यासाठी मांजरपाडा-१ योजनेचा प्रस्ताव असतानाही ते पाणी गोदावरी खोऱ्यात (येवला) वळवून नेले जात असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती पथकाने मांजरपाडा-१ योजनेचा अभ्यास दौरा केला. नारायणगाव शिवारपर्यंत (ता.चांदवड) जेमतेम कालव्याने पाणी येऊ शकलेले आहे. तेथून पुढे परसूलपर्यंत प्रकल्प निर्मितीपासून आजतागायत पाणी आलेले नाही. दरसवाडी व तेथून डोंगरगाव (ता. येवला) ८० कि.मी.पर्यंत कालव्याने पाणी यायला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या योजनेच्या पूर्णत्त्वासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मनमाड बचाव कृती समितीतर्फे करण्यात आले आहे. पथकात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा परदेशी, राजकमल पांडे, संतोष बळीद, तुकाराम सोनवणे, आर.व्ही. पाटील, सलीम सोनावाला, संतोष बाकलीवाल, महेंद्रस्ािंह परदेशी, नीलेश वाघ, उपाली परदेशी आदि कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)
मांजरपाड्याचे ‘गाजर’ दाखवून दिशाभूल !
By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST