त्र्यंबकेश्वर : येथे टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून प्लॅस्टिक बाटल्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या होडीतून पाच दिवसांच्या जवळपास तीनशे ते सव्वातीनशे गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यासाठी आज प्लॅस्टिक बाटल्यांची होडी पाण्यात उतरविण्यात आली.त्र्यंबकेश्वर येथील आयपीएल ग्रुपच्या हौशी युवकांना या टाकाऊ बाटल्यांची शक्कल सुचली आणि ही संकल्पना लगेच अमलात आणून सतत दोन महिने मेहनत घेऊन ही बाटल्यांची होडी तयार करण्यात आली. या होडीची प्रायोगिक चाचणी शनिवार, दि. ३ आॅगस्ट २०१६ रोजी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरली. त्यानंतर होडी ठेऊन देण्यात आली.पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनप्रसंगी पुन्हा किरकोळ सुधारणा व डागडुजी करून होडी ज्या कामासाठी तयार केली गेली त्या गणेश विसर्जनाची कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली. याकामी ललित लोहगावकर (माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य), श्यामराव गोसावी, पिंटू नाईकवाडी, अमोल दोंदे, रमेश झोले, गणेश गुरव, पराग दीक्षित, अमोल पगार, खंडू भोई, बाजीराव धात्रक, विशाल बागडे, श्याम दोंदे, भोलानाथ शेलार, नितीन शिंदे, अशोक गांगुर्डे व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
बाटल्यांच्या होडीतून विसर्जन
By admin | Updated: September 12, 2016 00:53 IST