त्र्यंबकेश्वर : अंजनेरी गाव दत्तक घेतल्यानंतर गावाच्या विकासाकरीता निधी मिळण्यास विलंब झाला. त्यात अधिकाऱ्यांचेही थोडे दुर्लक्ष झाले. मात्र आता सर्व अधिकारी कामाला लागले असल्याने येत्या वर्षभरात अंजनेरी तीर्थक्षेत्राचा चेहरा-मोहरा बदललेला असेल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.अंजनेरी संसद आदर्शग्राम योजनेअंतर्गत कृती आराखड्यानुसार विविध विकासकामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्वप्रथम लोकसहभाग महत्त्वाचा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून गावागावांतील तीर्थक्षेत्रांचा विकास होत आहे. मोदी यांच्या संकल्पनेतील ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत देशातील आठ तीर्थक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव श्री त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राचा समावेश झाला आहे. या योजनेत अंजनेरीचाही समावेश व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे गोडसे यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच कमळू कडाळी, राजेंद्र बराडे, प्रभाकर शिंदे, उपसरपंच पंडितराव चव्हाण आदिंनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अंजनेरीच्या सरपंच पुष्पा बराडे, सदस्य दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, सोमनाथ बराडे, एकनाथ श्ािंदे, बापू बराडे, कौसाबाई कामडी, रत्ना शिंदे, सुषमा चव्हाण, भागीरथी सोनवणे, गंगूबाई कडाळे, सविता कडाळी आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
अंजनेरी तीर्थक्षेत्राचा लवकरच विकास
By admin | Updated: September 25, 2016 23:44 IST