मालेगाव : तालुक्यातील दहिदी येथे हरियाली शेततलाव योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी संबंधित सरपंच, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मालेगाव पंचायत समितीच्या सभापती वंदना पवार यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील दहिदी गावासाठी हरियाली योजनेंतर्गत शेत तलाव मंजूर झाले. दरम्यान, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी कानावर येऊ लागल्याने आपण प्रत्यक्ष या कामास भेट दिली. स्थानिक पातळीवर चौकशी केली. कागदपत्रे पाहता देवीदास मन्साराम भामरे यांचे नावे एक लाख १२ हजार ५९१ रुपये हे सरपंच, ग्रामसेवक व कृषिविस्तार अधिकारी यांच्या सहीशिक्क्यासह काढण्यात आल्याचे आढळून आले. तसेच निंबाजी मोतीराम कचवे या लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतावर भेट दिली असता शेत तलावाचे काम २५ टक्के झाल्याचे आढळून आले; परंतु त्यांच्याही नावावर एक लाख १२ हजार ५९१ रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास आले.
मालेगावी शेततलाव योजनेत भ्रष्टाचार
By admin | Updated: July 19, 2014 00:50 IST