नाशिक : बाबाराव सावरकरांनी त्यांचे जीवन देशाला वाहून देशातील तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला. ब्रिटिशकाळात त्यांच्यावर खटला भरण्याची एकही संधी ब्रिटिशांनी सोडली नाही. पण बाबारावांनी हार न मानता जीवनाच्या अखेरपर्यंत लढा दिला, असे वसुधा परांजपे यांनी सांगितले. राणी लक्ष्मीबाई स्मारकात नवरात्रीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.बाबारावांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी जे योगदान दिले ते अमूल्य आहे. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. त्यावेळी विजेचा जीवघेणा प्रवाह त्यांच्यावर सोडून त्यांना मरणयातना भोगायला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भाग पाडले. त्यांना वेडे ठरवून पायात बेड्या घातल्या गेल्या व नाशिकला पायी फिरविण्यात आले, तरी त्यांनी देशासाठीचा लढा सुरूच ठेवला, असेही त्या म्हणाल्या. तसेच यावेळी परांजपे यांनी सावरकर बंधूंचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य, अभिनव भारत चळवळ, हिंदू युवक संघटना यांची माहिती दिली. सावरकरयुगाचा प्रवास सांगून सावरकर कुटुंबीयांनी स्वातंत्र्यलढ्यात केलेले काम अतुलनीय असल्याचे त्या म्हणाल्या. नवरात्रोत्सवानिमित्त रोज राणी लक्ष्मीबाई स्मारकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस भजने, व्याख्याने, भोंडला, स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. (प्रतिनिधी)
बाबारावांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अमूल्यच
By admin | Updated: September 29, 2014 00:29 IST