घोटी : इगतपुरी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि स्वस्त दरातील धान्य विक्रेते यांच्या मनमानी कारभारामुळे घोटी शहरातील शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळविण्यासाठी स्वस्त धान्य दुकानासमोर तासन्तास रांगा लावून उभे रहावे लागत असल्याने या बाबीकडे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा विभागाने लक्ष घालून धान्य वितरणात सुसूत्रता आणावी अशी मागणी शिधापत्रिकाधारकाकडून होत आहे. घोटी शहरासह संपूर्ण तालुक्यात पुरवठा विभागाच्या नियोजनाच्या अभावी धान्य वितरणाचा बोजवारा उडाला असून, स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे हे धान्य मिळविण्यासाठी लाभार्थींना दुकानाच्या समोर भर उन्हात तासन्तास रांगा लावून उभे रहावे लागत आहे. शासन शेवटच्या घटकापर्यंत स्वस्त दरातील धान्य पोहोचविण्यासाठी विविध योजना राबवीत असताना मात्र इगतपुरी पुरवठा विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करून शासनाच्या आदेशाची आणि नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या विविध योजना केवळ नामधारी ठेवल्या जात असून, याबाबीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. अन्नसुरक्षा योजनेचाही बोजवारा एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व लाभार्थींना शासनाच्या वतीने अन्नसुरक्षा विधेयकामुळे स्वस्त दरातील धान्य मिळणे आवश्यक असताना मात्र इगतपुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ही योजना कागदावरच राबवून या योजनेतील पात्र लाभार्थी आपल्या मर्जीतील घेतले असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे या योजनेतील मूळ लाभार्थी मात्र वंचित राहिले आहेत. या योजनेअंतर्गत केशरी अंत्योदयसारखे केशरी शिधापत्रिका धारकासही दोन रुपये किलो दराने धान्य मिळणे गरजेचे आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांनी शक्कल लढवून कधीही स्वस्त दरातील धान्य न नेणार्या शिधापत्रिकाधारकाला या योजनेत सहभागी करून घेतले आहे. परिणामी हे धान्य शिल्लक राहून स्वस्त धान्य दुकानदाराला काळ्या बाजारात विकणे सोपे जाते. यासाठी योजनेतील लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
धान्य वितरणात सुसूत्रता आणावी
By admin | Updated: June 2, 2014 01:19 IST