गिरीश जोशी ल्ल मनमाडसध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या युगात पारंपरिक रीतिरिवाज लोप पावत असले तरी नांदगाव तालुक्यातील भालूर येथील महिलांनी मात्र आषाढ अमावास्येला पूर्वापारपणे चालत आलेल्या गावाबाहेरील लक्ष्मीआई मंदिरात नैवेद्य अर्पण करून इडापिडा टळण्यासाठी साकडे घालण्याची परंपरा आजही जोपासली आहे.अमावास्या म्हटली म्हणजे अशुभ दिवस असा समज सर्वत्र असला तरी, भालूर येथे या दिवशी मात्र वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आषाढ महिन्याचा समारोपाचा दिवस असलेल्या अमावास्येला गावाच्या पूर्व शिवारात उंच टेकडीवरील लक्ष्मीआई मंदिरात नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे. येथील महिलांनी ही रूढी आजही जोपासली आहे. महिला आपापल्या घरी तयार केलेला नैवेद्य घेऊन टेकडीवर मंदिरासमोर जमा होतात. येथील लक्ष्मीआई मंदिरात मनोभावे पूजन करून नैवेद्य ठेवण्यात येतो. गावातील इडापीडा टळून गावात सुखसमृद्धी नांदो यासाठी लक्ष्मीआईला साकडे घालण्यात येते. सर्व महिला एकमेकीला हळदीकुंकू लावून स्रेहभाव व्यक्त करतात. मंदिरासमोरच्या प्रांगणात सुख-दु:खाच्या विचारांची देवाणघेवाण होते. काही महिला आषाढ महिन्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी या मंदिरात येउन पूजन करतात. सध्या शहरी भागातील महिला विविध क्लबच्या माध्यमातून एकत्र येऊन गेट टूगेदर करत असल्या तरी भालूर येथील महिलांचा मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परांपरा जोपासण्याच्या प्रयत्नातून आपोआपच विचारांची देवाणघेवाण होत आहे.
संस्कृतीचे जतन : भालूरच्या महिलांनी जोपासली परंपरा
By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST