नाशिक : उशिरा पैसे भरणाऱ्या विभागातील सुमारे आठशे कारखान्यांच्या प्रतिनिधींना एकाच दिवशी एकत्र बोलावून त्यांची सुनावणी घेण्याचा उपक्रम भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने घेतला. देशातील हा पहिलाच उपक्रम पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती भविष्यनिर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली. दिल्लीच्या मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार ज्या कारखान्यांनी भविष्यनिर्वाह निधीचे पैसे उशिरा भरले अशा आठशे कारखान्यांना नोटिसा पाठवून कंपन्यांची डेमेजेस का करू नये याबाबत आज कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयात सुमारे दहा टेबल मांडून तेथे प्रथम आणि द्वितीय श्रेणीचेअधिकारी बसविण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी कारखान्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांचे लेखी लिहून घेण्यात आले. या सुनावणीच्या वेळी काही कारखान्यांनी आपली कागदपत्रे सादर केली, तर काही कारखान्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. वेळ मागून घेतलेल्या कारखान्यांनी वेळेवर कागदपत्रे सादर केली नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त जगदीश तांबे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)