फसवणूक : बंद झालेल्या सुवर्ण जयंती योजनेच्या नावाने शासकीय नोकरीचे आमिष
By Admin | Updated: January 10, 2015 23:04 IST2015-01-10T23:04:29+5:302015-01-10T23:04:50+5:30
बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा

फसवणूक : बंद झालेल्या सुवर्ण जयंती योजनेच्या नावाने शासकीय नोकरीचे आमिष
मालेगाव- केंद्र शासनाच्या गेल्या वर्षीच बंद झालेल्या सुुवर्ण ग्रामीण जयंती रोजगार योजनेच्या नावाने शहर-तालुक्यातील बेरोजगार तरुण- तरुणींना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांना गंडविण्याचे व फसविण्याचे कटकारस्थान उघडकीस आले आहे. असा प्रकार जिल्ह्यातील व राज्यातील इतर बेरोजगार तरुणांच्या बाबतीत देखील झाला असण्याची शक्यता आहे. शासनाने या प्रकरणी सविस्तर चौकशी करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संबंधित बेरोजगार तरुण- तरुणींकडून करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या नावाने गेल्या काही दिवसांपासून शहर- तालुक्यातील काही बेरोजगार तरुण -तरुणींना घरपोहोच पाकिटे येत आहेत. या पाकिटावर भारतीय स्वर्ण जयंती रोजगार योजनेचा शिक्का आहे. तसेच कार्यालय म्हणून इंडियन आॅइल पेट्रोलपंपाजवळ नवी मुंबई असा पत्ता आहे. कुठल्याही प्रकारची नोकरीची जाहिरात नसताना, उमेदवाराने अर्ज केलेला नसताना, संबंधित विभागातर्फे लेखी परीक्षा, मुलाखत असे सोपस्कार पार पाडले नसतानाही थेट उमेदवारांना नोकरी देण्यात येत असल्याचे पत्र प्राप्त होत आहे. जे युवक-युवती दहावी किंवा बारावी पास-नापास आहेत त्यांनादेखील असे पत्र प्राप्त झालेले आहेत. सहापानी असलेल्या या पत्रात पहिल्या पानावर ‘ सुवर्ण जयंती रोजगार योजना (भारत सरकार) महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश एवं उत्तराखंड के बेरोजगार युवक-युवतीयों के हेतू विशेष रोजगार योजना’ व त्या खाली ‘केंद्र सरकार का सिधी भर्ती योजना कानून वर्ष-२००९ अनुभाग
(दोन) खंड-४ असे लिहिलेले आहे. संपर्क क्रमांक म्हणून ०९९५८६४०२३७ हा क्रमांक देण्यात आलेला आहे. त्यात संबंधित तरुण-तरुणींना ‘सुचना अधिकारी’ म्हणून नोकरी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्याला जोडूनच मासिक सवीस हजार ५०० रुपये वेतन
(सभी भत्तो सहित) तसेच आवास एवं चिकित्सा सुविधा मुफ्त असा उल्लेख आहे. दुसऱ्या पानावर प्रारंभी योजनेची माहिती देण्यात आली आहे. वयोमर्यादा १८ ते ३५ निश्चित केली आहे. सदर नोकरीसाठी आधी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे व त्या प्रशिक्षणासाठी वीस हजार रुपये अनामत म्हणून भरण्याचे सूचित केले आहे. वीस हजारांपैकी बारा हजार बॅँकेद्वारा आणि उर्वरित आठ हजार रुपये संबंधित उमेदवाराच्या घरी चौकशी अधिकारी आल्यावर त्यास देण्यात यावे, असे म्हटले आहे. बॅँकेत पैसे भरल्यानंतरच चौकशी अधिकारी उमेदवाराच्या घरी येतील, असे नमुद करण्यात आले आहे. तिसऱ्या पानावर श्रम मंत्रालय भारत सरकारचे मुख्य सचिव म्हणून भूषण मेहता यांच्या नाव व सहीनिशी पत्र आहे. त्यात साध्या पेनाने त्या-त्या उमेदवाराचे नाव लिहून त्यास नोकरीची आॅर्डर देण्यात आली आहे. त्यात वार्षिक वेतन म्हणून तीन लाख १८ हजार रकमेचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ‘मिनिस्ट्री आॅफ कम्युुनिकेशन अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट आॅफ इंडिया’च्या नावाने शिक्का आहे. तज्ज्ञ व जाणकार व्यक्तींनी ही कागदपत्रे बनावट असल्याचे सांगितले.
मात्र थेट भारत सरकार लिहिलेले, सरकारी राजमुद्रा असलेले नोकरीचे म्हणून खाकी पाकिटातील अशा प्रकारचे पत्र प्राप्त होताच अल्पशिक्षित संबंधित उमेदवार व त्यांचे घरचे आधी आनंदित होतात. काही जणांनी मित्रमंडळीत याची वाच्यता केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.