सातपूर : उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून फडणवीस सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवून अडचणीत आलेल्या उद्योगांना विदर्भात नेण्याचा कुटील डाव मुख्यमंत्री खेळत असल्याचा आरोप सीटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केला आहे.मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना वीज दरात सवलत दिली आहे. अशीच सवलत नाशिकमधील उद्योजकांनाही मिळावी, अशी आग्रही मागणी डॉ. कराड यांनी केली आहे.तीन वर्षांपासून नाशिकमधील उद्योजकांचीही मागणी आहे. ही मागणी कायम असताना दि. २८ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भ, मराठवाड्याला वीजदरातील सवलत पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय कसा काय घेतला? मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे लघु आणि मध्यम उद्योग अडचणीत आले आहेत. असंख्य कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे. वास्तविक पाहता नाशिकला उद्योग येण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सीटू संघटना काम करण्यास तयार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.
नाशकातील उद्योग अडचणीत : कराड यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:09 IST