नाशिक : दिडोरी तालुक्यातील पिंप्रज येथील दत्तू रामा बोंबले यांचा पाण्याचा वादातून खून करणारे आरोपी वामन तुळशीराम बोंबले, मुरलीधर वामन बोंबले, विष्णू वामन बोंबले या तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल खडसे यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ ६ डिसेंबर २०१२ रोजी ही घटना घडली होती़ या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महादू रामा बोंबले यांचा आरोपी वामन तुळशीराम बोंबले हा चुलता, तर मुरलीधर वामन बोंबले व विष्णू वामन बोंबले हे नात्याने चुलतभाऊ आहेत. दोघांचीही पाझर तलावात जमीन गेली आहे़ त्यातच महादू बोंबले यांनी आपल्या शेतात गहू व बाजरीची पेरणी केली; मात्र पाणी कमी पडत होते़ त्यामुळे त्यांनी पाटबंधारे विभागाकडून पाझर तलावातून पाणी घेण्याची परवानगी काढली व डिझेल इंजिनही बसविले़ पाझर तलावातून पाणी काढू नको, आम्हाला पाणी कमी पडेल, असे महादू बोंबले यांना आरोपींनी सांगितल्याने ते ६ डिसेंबर २०१२ रोजी समजूत काढण्यासाठी गेले़ त्यावेळी त्यांना मारहाण करून त्यांची मुले दत्तू व रघुनाथ यांच्यावर कोयत्याने वार केले़ या तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दत्तू बोंबले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल खडसे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ सरकारी वकील सुनीता साळवे यांनी या खटल्यात अकरा साक्षीदार तपासून आरोपींवर आरोप सिद्ध केले़ त्यानुसार आरोपी मुरलीधर बोंबले, वामन बोंबले, विष्णू बोंबले या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली़ (प्रतिनिधी)
खून प्रकरणी दिंडोरीतील पिता-पुत्रांना जन्मठेप
By admin | Updated: June 9, 2015 01:59 IST