झोडगे : मोसम साळ कालवा दुरुस्त करून मोसम नदीच्या पूरपाण्याने दहिकुटे धरण भरून सिंचनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे पंचायत समिती सदस्य सुवर्णा देसाई यांनी केली.यावेळी विजय देसाई, सचिन देसले, योगेश देसले, भटू जगताप, किशोर मोरे, सुनील निकम, जळकूचे गोरख पवार, मुकुंद गायकवाड, सुधाकर राजोळे, अनिल मगर आदिंचा शिष्टमंडळात समावेश होता. सध्या माळमाथा परिसरात पाणीटंचाई जाणवत असून, सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. मात्र पाण्याअभावी शेती ओस पडली आहे. मोसम नदीचे वाहून जाणारे पूरपाणी मोसम साळ कालव्याद्वारे दहिकुटे धरणात पोहोचविण्यात येते. परंतु सदरचा कालवा हा अनेक वर्षांपासून दुरुस्त न केल्यामुळे कालव्यात गाळ, झाडे, झुडपे वाढल्यामुळे पूरपाणी पूर्ण क्षमतेने धरणापर्यंत पोहोचत नाही. सदर कालवा १५ हजार २०० कि.मी. पर्यंत डिझाईनप्रमाणे यंत्राने दुरुस्त होऊन भरून द्यावे. त्यामुळे दहिकुटे धरणाची क्षमता १०० दलघफू पाण्याचा फायदा सायने, दहिकुटे, चिखलओहोळ, देवारपाडे, जळकू व झोडगे येथील शेतकऱ्यांची ६०० हेक्टर शेती ओलिताखाली येईल म्हणून दहिकुटे धरण पूर्ण क्षमतेने भरून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. झोडगे येथील धनदाई माता मंदिराचा एक कि.मी.चा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही. भिलकोट ते गुगळवाड रस्ता दुरुस्तीची मागणीही निवेदनाद्वारे केली.दरम्यान, झोडगे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भिकनराव देशमुख, सचिव धर्मराज सोनवणे, हिम्मतराव देसले, हिलाल देसले, मधुकर देवरे या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी केली. यावेळी भाजपाचे लकी गिल उपस्थित होते. (वार्ताहर)
पूरपाण्याने शेती ओलिताखाली आणा
By admin | Updated: April 4, 2017 00:59 IST