नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने वृक्षलागवडीकरिता लागणाऱ्या अडीच कोटी रुपयांसाठी उद्योजकांनी मदतीचा पुढे केलेला हात महापौरांनी अव्हेरला असला, तरी आयुक्तांनी मात्र स्वीकारला आहे. यासंदर्भात बुधवारी (दि. २) निमाच्या पदाधिकाऱ्यांना आयुक्तांनी चर्चेसाठी बोलावले आहे. महापालिकेने शहरात वृक्षलागवडीसाठी निविदा मागविल्या आहेत. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून महापालिकेने ठेकेदारामार्फत वृक्षलागवडीची तयारी केली; परंतु दरवर्षी वृक्षलागवडीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होते आणि वृक्षलागवड होत नाही. त्यातच महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने निमा या उद्योजकांच्या संघटनेने वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेतला आणि महापौर अॅड. यतिन वाघ यांची भेट घेतली. महापालिकेने जागा सांगितल्यास त्या सर्व ठिकाणी वृक्षलागवड आणि जतन करू, त्या बदल्यात महापालिकेकडून कोणताही फायदा नको आहे, पालिकेला खात्री नसेल तर वृक्षलागवडीबाबत करार करू, असे उद्योजकांच्या वतीने मनीष कोठारी, मनोज पिंगळे, रवि वर्मा, मंगेश पाटणकर आणि व्हिनस वाणी यांनी सांगितले होते; परंतु महापौरांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. दरम्यान, हेच निवेदन आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी मात्र उद्योजकांना तातडीने बोलावणे धाडले आहे. बुधवारी सकाळी निमाचे पदाधिकारी, पालिकेचे वृक्ष प्राधिकरण अधिकारी यांची बैठक होणार असून, त्यात महापालिकेची अपेक्षा काय आहे, उद्योजक काय करणार आहेत याचा आढावा घेतला जाईल, असे आयुक्त संजीवकुमार यांनी सांगितले. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यास पालिकेचे सुमारे अडीच कोटी रुपये वाचणार आहेत. (प्रतिनिधी)