पंचवटी : सिंहस्थातील पहिल्या पर्वणीच्या दिवशी मित्रांसमवेत गांधीतलावात स्नान करण्यासाठी गेलेला व खोलीचा अंदाज न आल्याने बुडालेला म्हसरूळचा सतरा वर्षीय मुलगा अतुल राजेंद्र पाटील (शेलार) यास जीवरक्षक व डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले होते़मात्र, या घटनेत मेंदूला झालेली इजा उपचारांनंतरही भरून निघाली नाही़ अखेर १०० दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या अतुलचा रविवारी (दि़६) सकाळी मृत्यू झाला़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़मूळचे जळगाव जिल्ह्यातील राजेंद्र व आशाबाई पाटील हे रोजगाराच्या शोधार्थ नाशिकला आले़ कित्येक वर्षांपासून पाटील हे शहरातील एका फर्निचरच्या दुकानात, तर त्यांची पत्नी आशाबाई या धुणीभांडीचे काम करतात़ २९ आॅगस्ट अर्थात पहिल्या सिंहस्थ पर्वणीसाठी मुलगा अतुल हा गावातीलच काही मित्रांसमवेत पंचवटीत स्नानासाठी गंगेवर आला होता़ दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास गांधीतलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला अन् दिसेनासा झाला़गांधीतलावात मुलगा बुडाल्याचे जीवरक्षक दलातील जवानांच्या लक्षात येताच भाविकांच्या सांगण्यावरून अंदाज घेत त्यांनी अतुलला पाण्याबाहेर काढले आणि जवळच्या ‘डिस्पेन्सरी’त दाखल केले़ हृदयाचे ठोके बंद पडलेल्या अतुलला डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न करून वाचविले़ यानंतर त्यास प्रथम महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय आणि त्यानंतर मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले़ या ठिकाणी सुमारे दोन महिने उपचार करण्यात आले़ त्यामध्ये अतुलचा नैसर्गिक श्वासोच्छवास सुरू झाला मात्र मेंदूची हानी भरून निघाली नाही़ (वार्ताहर)
पर्वणीतील जखमी अतुलचा अखेर मृत्यू
By admin | Updated: December 7, 2015 00:02 IST